१ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान

नवी मुंबई : स्वच्छतेचा आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' अंतर्गत स्वच्छता अंगिकारुया, आजारपण पळवूया अशी संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने वेगवेगळे उपक्रम राबविण्यास आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आधीपासूनच सुरुवात केली आहे.

याबाबत करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करताना घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत सर्वच विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सदर ‘अभियान'च्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.

या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन, कचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छताविषयक जागरुकता आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर भर, शुध्द जलाच्या नियमित चाचण्या, स्वच्छ-शुध्द पाण्याचा पुरवठा आणि पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल, आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रामध्ये विशेष लक्ष आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि पावसाळी कालावधीत घ्यावयाच्या आरोग्य विषयक दक्षतेबाबत जनजागृती-माहिती प्रसार, पीपीटी अर्थात आरोग्य विषयक संरक्षण प्रतिबंध आणि उपचार अंमलबजावणी अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येणारे आहे.

विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ‘स्वच्छता अभियान'चे केंद्रीय अधिकारी असणार असून आपापल्या विभागातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे काम करण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल. प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या पालक अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागात स्वच्छता कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष द्यावे. यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दुर्लक्षित जागांची स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. त्यामध्ये स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी निर्देशित केले.


स्वच्छतेबाबत जागरुकता वाढविण्यासोबतच विभागांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी आणि यामधून शहर स्वच्छतेचा स्तर उंचवावा यादृष्टीने विभाग कार्यालयांमध्ये आंतरविभागीय स्वच्छता स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेत मार्केटस्‌ची स्वच्छता, शाळा आणि महाविद्यालयांतील स्वच्छता, बसस्टँड-हॉटेल्स-पेट्रोल पंप-वाणिज्य संकुले आणि आस्थापना अशा प्रकारची सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणांवरील स्वच्छता, सार्वजनिक उद्यानांची स्वच्छता अशा निकषानुसार त्रयस्थ परीक्षणाद्वारे निवड करण्यात येईल, असे आयुवत म्हणाले.

मार्केटस्‌ प्लास्टिकमुक्त करणे आपले प्रमुख उद्दिष्ट असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली तयार करावी. त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी. कापडी पिशव्या निर्मिती प्रक्रियेत नमुंमपा क्षेत्रातील महिला बचत गटांना सहभागी करुन घ्यावे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा यादृष्टीने त्यांची मनोभूमिका तयार करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यावर भर द्यावा. 

यासोबतच किरकोळ बाजारात प्लास्टिक पिशव्या येऊच नयेत याकरिता कार्यप्रणाली राबविण्याच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलावीत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.प्रत्येक विभागात होणाऱ्या स्वच्छताविषयक उपक्रमांना सर्व प्रसार माध्यमांतून आणि महापालिकेच्या समाज माध्यमांतून व्यापक प्रसिध्दी द्यावी. जेणेकरुन इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. ज्या सोसायटयांमध्ये स्वच्छताविषयक चांगले काम होत आहे, त्यांना प्रसिध्दी देऊन प्रोत्साहीत करावे, अशाही सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच संबंधित विभागप्रमुख, विभागांचे पालक अधिकारी, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिवणी मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी