डेब्रीज प्रतिबंधासाठी ‘ठाणे'च्या सर्व प्रवेशद्वारांवर लवकरच २४ तास गस्ती पथके

ठाणे : कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण-संवर्धन अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांवर कोणत्याही स्वरुपाच्या डेब्रीजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच ‘ठाणे'कडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रीज घेऊन येणाऱ्या डंपरमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डंपींगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण-संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी २२ मे रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण-संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्यासंदर्भात महापालिकेची कार्यवाही याची माहिती या बैठकीत दिली.

कांदळवनाच्या बाबतीत कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी आहे. सर्वप्रथम सीआरझेड हद्दीपासून ५० मीटरच्या बफर झोनचे तत्काळ सीमांकन करण्यात यावे. जेणेकरुन कांदळवनाचे नेमके क्षेत्र निश्चित होऊन सहाय्यक आयुक्त यांना कार्यवाही करणे शक्य होईल, असे आयुक्त राव यांनी  स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरुपाची भरणी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी त्याच्या सीआरझेड हद्दींचे सीमांकनाचे मोजमाप ‘महापालिका पर्यावरण विभाग'ने ‘जिल्हाधिकारी कार्यालय'च्या सहकार्याने तत्काळ करावे. त्यांच्याकडून शास्त्रशुध्द पध्दतीने मोजमाप होईपर्यंत ‘शहर विकास विभाग'ने ढोबळमानाने मोजणी करुन त्या जागांवर भराव टाकला जाऊ नये, असे फलक तत्काळ लावावेत. - सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.


आनंदनगर चेक नाका, मुलुंड चेक नाका, आदि ठिकाणी तातडीने २४ तासांसाठी तीन पाळ्यांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात यावीत. या गस्ती पथकातील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत. या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारे डेब्रीज रोखले जावे, असेही राव यांनी सांगितले. टप्प्याटप्पाने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर अशा पध्दतीने गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत.

खारेगाव टोलनाका लगत कांदळवनावर सुरु असलेल्या भरावाबाबत तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कांदळवन परिसराकदे जाणाऱ्या सगळे वाटा अडवल्या जाव्यात. तिथे साठलेल्या भरावाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असेही राव म्हणाले.

दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाले आहे. तेथील बायो मायनिंगसाठीचा निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे. ‘आचारसंहिता'नंतर कार्यादेश दिला जाईल. या पावसाळ्यात येथील गाळमिश्रित पाणी वाहून ते खाडीत जाणार नाही यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना करण्याचे निर्देश राव यांनी घनकचरा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

सदर बैठकीत कोकण विभागीय कांदळवन आणि पाणथळ जागा संरक्षण-संवर्धन समितीचे सदस्य दयानंद स्टॅलीन यांनी कांदळवनांवर होत असलेल्या अतिक्रमणांकडे गांभीर्याने पाहण्यास सांगितले. तसेच कोणतीही पाणथळ जागा अधिसुचित होण्याची वाट न पाहता तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम, उपायुक्त (परिमंडळ-१) मनिष जोशी, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, कोकण विभागीय कांदळवन-पाणथळ जागा संरक्षण-संवर्धन समितीचे सदस्य दयानंद स्टॅलीन, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सचिन बोरसे, अक्षय गुडदे, प्रितम पाटील, बाळू पिचड, सोपान भाईक, आदि उपस्थित होते.

नागरिकांना आवाहन...

कांदळवन क्षेत्र किंवा त्यालगत असलेल्या सीआरझेड हद्दीत नागरिकांनी कोणतेही बांधकाम करु नये. तसेच अशा जागेतील चाळी, इमारती यात घरे घेऊ नये. कांदळवन संरक्षणाबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी बांधकामे अनधिकृत असून ती जमीनदोस्त करण्यात येतील. त्यामुळे घर खरेदी करताना ‘सीआरझेड'च्या नियमांचा भंग झालेला नाही, याची खात्री करुनच नागरिकांनी घरे घ्यावीत. त्यासाठी महापालिकेच्या स्थानिक प्रभाग समितीत चौकशी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांना नागरिकांना केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळंबुसरे बायपास रस्त्याचा तिढा सुटता सुटेना!