खाडीकिनारी वाढले जलप्रदुषण

उरण : उरण-पनवेल मधील विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदुषण वाढले आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदुषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जेएनपीए बंदर आणि नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उरण-पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात काही भांडवलदारांनी आपला व्यवसाय उरण-पनवेल खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या शेतजमिनीवर सुरु केला आहे. अशा खाडीकिनाऱ्यावरील शेतजमिनीवर दगड मातीचा भराव टाकला जात असून त्या भरावात खारफुटीचे जंगल वाढणारे पाणलोट क्षेत्रही बुजविले जात आहे. खाडीतील वाढते जलप्रदुषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसत आहे.

सदर मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी किसन जावळे, मत्स्य विभागाचे अधिकारी यांनी सदर बाबींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी पारंपरिक मासेमारी करणारे व्यावसायिक करीत आहेत.

उरण बरोबर पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आगरी, कोळी कराडी समाजाचे लोक वास्तव करीत आहेत. परंतु, वाढत्या औद्योगिकरण, जलप्रदुषण यामुळे या बांधवांचा प्रमुख व्यवसाय असणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात येत आहे. त्यामुळे शासनाने, संबंधित प्रशासनाने सदर बाबींवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी नष्ट होणार नाही आणि विविध प्रकारच्या समुद्रातील माशांच्या प्रजाती नष्ट होणार नाही. -जयवंत कोळी, कौशिक ठाकूर-व्यावसायिक. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास २६ मे पासून महाग