१० आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, तेव्हा विचार करूनच मतदान करा - बच्चू कडू
कल्याण : १० आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, तेव्हा विचार करूनच मतदान करा असे आवाहन प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी कल्याण-भिवंडीकरांना केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या कल्याण येथील फडके मैदानातील प्रचार सभेत बोलत होते.
तुम्ही किती आहेत आणि कोण विरोधात आहे हा विषय महत्त्वाचा नाहीये तर आपण किती आहोत आणि काय आहोत हे महत्वाचे आहे. आज खरी परीक्षा उमेदवाराची नाही तर मतदाराची आहे. मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो तेव्हा माझ्या सोबत कोणताच पक्ष नव्हता, कोणताच धर्माचा झेंडा नव्हता की दिल्ली मुंबईचा कोणता मोठा नेता नव्हता. आपल्यासारखी जनता होती म्हणून बच्चू कडू निवडून आला. हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक कार्यकर्ता आम्ही का निवडून देत नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे.
काम करणाऱ्या निलेश सांबरे सारख्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मजबुतीने एकत्र या आणि त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा. गरीबांसाठी कानाकोपऱ्यातून लढणारा एक एक माणूस जरी तयार झाला तरी शेतकरी आणि कष्टकरी हा सुखाने झोपेल म्हणूनच निलेश सांबरे सारखी व्यक्ती ही या व्यवस्थेत आली पाहिजे, असे सांगत आमदार कडू यांनी निलेश सांबरे यांना निवडून आणण्यासाठी उपस्थित जनतेला आवाहन केले.
एक शेतकऱ्याचा मुलगा त्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन उमेदवाराविरुद्ध माझ्यासोबत समविचारी असलेल्या महाराष्ट्रातील अनेक संघटना, अनेक जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, शेतकरी बांधव व इतर सर्व समाजाचे तसेच विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारोंच्या संख्येने सर्व पदाधिकारी यांच्या ताकतीने मी निवडणूक लढत आहे” असे प्रतिपादन जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष व भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी सभेत बोलताना केले.