लोकल मधील गर्दीचा पुन्हा बळी

डोंबिवली : पुन्हा एकदा लोकलच्या गर्दीने बळी घेतला आहे. कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून रुळावर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ६ जून रोजी सकाळी घडली आहे. डोंबिवली शहरातील केयूर सावळा (३७) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, यापूर्वीही असा अनेक घटना झाल्या असून रेल्वे प्रशासनाने यावर काहीतरी तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे.

मागील महिन्यात लागोपाठ लोकलमधून पडून महिला, पुरुष, तरुण असे तिघा जणांचे बळी गेले आहेत. अशी घटना झाल्यानंतर तात्पुरती याविषयी वर्तमानपत्रांतून मथळ्यावर मथळे छापून येतात. मात्र, त्यानंतर पुन्हा काहीच वाच्यता होत नाही. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने केव्हा पाहणार? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

६ जून रोजी नेहमीप्रमाणे दोन प्रवाशी मित्रांनी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवली स्थानकातून फास्ट लोकल मध्ये गर्दीचा सामना करीत लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने त्यातील एक मित्र बबन शिलकर कसाबसा रेटारेटी कसरत करत लोकलच्या डब्यात आत घुसला. मात्र, मयत केयूर सावळा बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकला गेला. गर्दीमुळे केयूरला डब्यामध्ये आत प्रवेश करता आला नाही. बबन शिलकर यांनी केयूरला सावरण्यासाठी हात दिलाही होता. मात्र, बबनच्या हातातून केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केयूर लोकल मधून खाली पडला.

केयूर लोकल मधून पडल्यानंतर बबन शिलकर यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. त्यांनी केयूर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स मागितली. मात्र, यावेळी ॲम्बुलन्स बाहेर गेली असल्याचे सांगण्यात आले. यानंतर केयूर सावळा याला बेशुध्द अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पो मधून दाखल करण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी केयूर याला मृत घोषित केले.

दरम्यान, डोंबिवली स्थानकातून लोकल मध्ये चढणे-उतरणे खूप धोवयाचे झाले आहे. लोकांचे नाहक बळी जात आहेत. लोकांच्या सुखकर प्रवासासाठी डोंबिवली स्थानकातून जास्त लोकल सोडण्यात याव्यात. तसेच कर्जत-ठाणे, कसारा-ठाणे, कल्याण-ठाणे आणि परत अशा पध्दतीने लोकल गाड्या सोडाव्यात, अशी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 इस्टेट एजंट दुवकलीकडून फ्लॅट मालकाची फसवणूक