ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा ढासळला भाग

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक ‘कल्याण'चे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळल्याने कल्याणकरांकडून हळहळ व्यक्त होत आहे. १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुचा सदर बुरुज आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षांपूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. या नवीन बुरुजाचा खालील भाग ढासळला असल्याचे १३ जून रोजी रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच सदर नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागही कधीही कोसळू शकण्याची भिती व्यक्त होत आहे.

दुसरीकडे दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथराही एका बाजुने खचू लागला असून त्याची आणि ढासळलेल्या बुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली असून त्यापैकी सुरुवातीला २.५० कोटी आणि नंतर ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप दुर्गाडी किल्ल्याच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाही.

दरम्यान, या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच ‘कल्याण'च्या खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, काळाच्या ओघामध्ये सदर ठिकाणी आता दुर्गादेवीचे मंदिर, काही बुरुज आणि मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ इतकाच भाग शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श या किल्ल्याला आणि कल्याण शहराला लाभलेले असून त्यांची सदर सुवर्ण क्षणांची ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ल्याचे वैभव जपण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची अपेक्षा दुर्गप्रेमी आणि कल्याणकर नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘ठाणे'तील सर्व धोकादायक इमारतींची २ दिवसात प्रत्यक्ष पाहणी करा