ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम; आयुवतांकडून पाहणी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे यासाठी २४ मे रोजी संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकाचवेळी विशेष सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कळवा येथे सहभाग घेतला. कळवा येथील ९० फुटी रस्ता येथे सुरु असलेल्या स्वच्छतेची आयुक्तांनी पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, सहायक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदि अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले. यानंतर आयुक्त राव यांनी खारेगांव येथील तलावाची पाहणी केली. तेथील नागरिकांची संवाद साधून शौचालय, स्वच्छता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली.

सदर मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्यावर होती. तर सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्त राव यांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार वागळे इस्टेटसाठी अनघा कदम, वर्तकनगर साठी वर्षा दिक्षीत, कोपरी-नौपाडासाठी शंकर पाटोळे, माजिवडा-मानपाडा साठी दिनेश तायडे, कळवा साठी उमेश बिरारी, उथळसर साठी जी. जी. गोदेपुरे, लोकमान्य-सावरकर नगरसाठी महादेव रोडगे, मुंब्रा साठी मनिष जोशी आणि दिवा साठी सचिन पवार यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती.

सफाई मोहिमेत दैंनदिन साफसफाई सोबत मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात आला.

लवकरच ९० फुटी रस्ता रुंदीकरण-सुशोभिकरण...

कळवा येथील ९० फुटी रस्त्याचे रुंदीकरण तसेच सुशोभिकरण अशी कामे प्रस्तावित आहेत. सदर कामांना गती देऊन रस्त्याची स्थिती पादचारी स्नेही करावी, असे आयुक्त राव यांनी कार्यकारी अभियंता यांना सांगितले.

सदर रस्त्यावर पादचारी, सकाळी फिरायला येणारे नागरिक यांना सोयीचे होईल अशा पध्दतीने काम व्हावे. दोन्ही बाजुला हरित मार्ग, रस्त्याच्या दुभाजकावर हरित पट्टा तयार करावा. सुशोभिकरणासाठी तज्ञांचा सल्ला घेण्यात यावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. सदर रस्ता पुढे महामार्गाला जोडला जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी नागरिकांनी सर्वंकष स्वच्छता मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच फेरीवाल्यांकडून टाकला जाणारा कचरा, अनधिकृत पार्किंग आदि समस्याही मांडल्या. याच भागात असलेल्या खुल्या प्रेक्षागृहाचीही आयुक्त राव यांनी नागरिकांसह पाहणी केली.

दरम्यान, नागरिकांनी या भागात कचरा पडणार नाही यासाठी सतर्क राहावे. महापालिको कर्मचारी त्यांचे काम करतीलच; पण कचरा टाकण्याच्या नवीन जागा तयार होणार नाहीत, याची दक्षता स्थानिकांनीही घेण्याचे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सर्व जाती-धर्म प्रचारकांकडून एकत्रित बुध्द जयंती साजरी