दहावी नंतर नेमके काय? मार्गदर्शनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेचा पुढाकार
एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील पाणी जोडणी पूर्ववत
व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केट मधील खंडीत करण्यात आलेली नळ जोडणी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या प्रयत्नाने पूर्ववत करण्यात आली आहे.
एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील इमारती महापालिका तर्फे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या असून, त्या रिकाम्या करण्यासाठी १९ जून रोजी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील संपूर्ण नळ जोडणी खंडीत करण्यात आली होती. तसेच वीज जोडणी दोन दिवसानंतर खंडीत करण्यात येणार होती. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नळ जोडणी खंडित केल्याने पाण्याविना एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील माथाडी, व्यापारी आणि इतर बाजार घटकांची कुचंबना होत होती. पाण्याअभावी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारमध्ये उद्भवलेली समस्या घेऊन कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापारी संजय पिंगळे, अनिल गटकळ, कारभारी दाभाडे, राजु मणियार, संजय छेडा, हेमंत पारख, इरफान शेख आणि विकास गाढवे यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे एपीएमसी कांदा-बटाटा आवारातील पाणी जोडणी पूर्ववत करण्याची विनंती केली होती. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना व्यापाऱ्यांच्या समस्या समजावून सांगून, कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी व्यापार कसा आणि कुठे करायचा?, असा प्रश्न उपस्थित केला. तसचे कांदा-बटाट्याचा तुटवडा निर्माण झाला तर वेगळ्या समस्या निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे निदर्शनास आणून, कांदा-बटाटा मार्केट मधील पाणी जोडणी पूर्ववत करावी, अशी विनंती विजय नाहटा यांनी केली. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रशासनाला आदेश देऊन कांदा-बटाटा मार्केट येथील नळ जोडणी पूर्ववत करण्याचे आदेश दिले. पाणी जोडणी केल्यामुळे कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापारी संजय पिंगळे, अनिल गटकळ, कारभारी दाभाडे, राजु मणियार, संजय छेडा, हेमंत पारख, इरफान शेख आणि विकास गाढवे यांनी विजय नाहटा यांचे आभार व्यक्त केले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये पाण्याचे कनेक्शन पूर्ववत झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.