ठाणे मधील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामाच्या टॉवर क्रेनची लवकरच तपासणी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे, यांचीही माहिती तात्काळ घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर शहरातील सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग फलक सहन करु शकतील, याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्याची सूचनाही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला केली आहे.

‘ते' ३३ जाहिरात फलक काढून घ्यावेत...

महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजुनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून सदर फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

‘त्या' इमारतींवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई...

वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. संबंधित इमारतींनी पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुुरु करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले आहेत.

पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २४ जून रोजी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, आदि उपस्थित होते.

अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करुन या इमारती रिक्त होतील, ते सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे निर्देश आयुवतांनी दिले.

दरम्यान, नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलतनगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. इतर प्रभागातील ८ इमारती अति धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आवश्यकतेनुसार पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपध्दती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार  पाहणी करावी. तसेच ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यास तयार नसतील, त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी-१ मध्ये करुन त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटी कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरु करावी.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील पाणी जोडणी पूर्ववत