१५ जुलैपर्यंत कधीही नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त?

नेरुळ-उरण रेल्वेला उद्‌घाटनाची प्रतिक्षा कायम
 

उरण : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी मुहूर्त काढण्यात रेल्वे प्रशासन मश्गूल झाले आहे. सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरुन प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे धावणार आहे. मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवावा यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येत्या १५ जुलैपर्यंत कधीही नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरु केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. १७८६ कोटी खर्चाचा २७ कि.मी. लांबीचा सदर रेल्वे मार्ग उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीपासूनच या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरु झाले होते. मात्र, त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.

दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील  खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरुही करण्यात आली आहे. त्यानंतर खारकोपर ते उरण रेल्वे स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरु करण्यात आली आहेत. वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन-चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पूर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुुरु करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या. फेब्रुवारी, मार्च, मे-२०२३ महिन्याच्या अखेरीस नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ‘रेल्वे'च्या सुरक्षा यंत्रणांकडून अनेक वेळा या मार्गावर ट्रायल रनही घेण्यात आली आहे. मात्र, खारकोपर ते उरण या दरम्यानच्या मार्गावरील अनेक कामे अपूर्ण आहेत. आजच्या घडीपर्यत तरी जासई रेल्वे स्थानकाचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी विलंब होत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

मात्र, वारंवार रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुहूर्तावरही प्रवासी वाहतूक सुरु झाली नाही. यामुळे लोकप्रतिनिधी या कामासाठी पाठपुरावा करण्यात कुठेतरी कमी पडत असावेत अथवा रेल्वे प्रशासन कामकाजात कमी पडत आहे, अशा शंकाकुशंका नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. नागरिकांच्या शंकाकुशंकांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकप्रतिनिधींकडून नुकत्याच ओडीशातील बालासोर रेल्वे अपघातामुळे उद्‌घाटन पुढे ढकलण्यात आले असल्याची तकलादू कारणे पुढे केली जात आहेत. पण, या परिसरातून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेरुळ-उरण रेल्वे मार्गाचा मुद्दा परिसरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीही नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या मुहूर्तासाठी आग्रही आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच या रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन व्हावे यासाठी ते आग्रही आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे धोशा लावला आहे. त्यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरु केली आहे.

येत्या २० जुलैपासून पुढील २३ दिवस पावसाळी संसदीय अधिवेशन सुरु होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान विविध कार्यक्रमांसाठी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. या मुंबई दौऱ्यादरम्यानच १५ जुलैपर्यंतच्या दहा दिवसातच सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरुन प्रवाशांना घेऊन पहिल्या रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरु केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींमध्ये टेकू लावून काम सुरु