‘एमएमआरडीए'च्या ठाणेतील सर्व प्रकल्पांचा आढावा
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ‘एमएमआरडीए'मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरु आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदि गोष्टींबाबत ठाणे महापालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. सदरचे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
‘एमएमआरडीए'मार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरु असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी रोजी बैठक झाली. या बैठकीस ‘एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहायक संचालक (नगररचना) संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदिंचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडी पुल, कासारवडवली ते खारबाव खाडी पुल, कोलशेत ते काल्हेर खाडी पुल, ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. ठाणे महापालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर सदर बैठकीत चर्चा झाली.
ऐरोली ते कटाई नाका उन्नत रस्त्यासाठी भूसंपादन...
ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
ऐरोली ते कटाई या रस्त्यासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिका द्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता. त्यात वाढ होऊन आणखी जागा किती लागेल, तसेच त्याचा खर्च किती येईल यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सुरक्षा अनामत रवकमेबाबत सवलत...
नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर, वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रवकमेत ‘एमएमआरडीए'ला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्राेपण, नवीन झाडे लावणे अशी कामेही उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च ‘एमएमआरडीए'कडून दिला जाईल, असे ‘एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर रस्ता एकत्रीकरण...
घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रिकरण करण्याच्या प्रकल्पात ‘महावितरण'च्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका यांनी पुढील ८ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे. तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुवत राव यांनी या बैठकीत दिले.
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग...
ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज ८ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ठाणे महापालिकेच्या मल-जलशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत तसेच अमृत जल योजना अंतर्गत १५०० एमएम आकाराच्या जलवाहिनीच्या मार्ग स्थलांतराबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला.
गायमुख ते पायेगाव खाडीपुल...
गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वन विभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा १५ दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुद्गल यांनी बैठकीत दिले.