अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात रात्री केमिकल टँकरला बंदी
उद्यापासून आदेशाची अंमलबजावणी
उल्हासनगर : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी आणि उल्हास नद्यांचे प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे. या नद्यांमध्ये केमिकल टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणावर विषारी रसायने सोडली जात असल्याने नद्यांचे पाणी घातक बनले आहे. परिणामी, या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीत प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. उद्या ५ जानेवारी २०२५ पासून एमआयडीसी परिसरात केमिकल टँकरची संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत ये-जा पूर्णपणे थांबवली जाणार आहे.
वनशक्ती या एनजीओच्या सततच्या पाठपुराव्यानंतर वालधुनी आणि उल्हास नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने नद्यांचे प्रदुषण थांबवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली एमआयडीसी मध्ये केमिकल टँकरच्या हालचालींवर मर्यादा घालण्यात आली आहे.
त्यानुसार उद्या ५ जानेवारी २०२५ पासून अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात दररोज संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत १२ तासांसाठी केमिकल टँकरला प्रवेशबंदी लागू केली जाईल. जर या आदेशाचे उल्लंघन करुन टँकर या क्षेत्रात दिसले, तर संबंधितांविरुध्द पोलीस विभागाकडून गुन्हा दाखल करुना कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. वालधुनी आणि उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी रसायनांमुळे नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांचे जीवन अत्यंत कष्टमय झाले आहे. या नद्यांच्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या विषारी वायूंमुळे अनेक रहिवाशांना श्वसनाचे त्रास होतात. काही वेळा परिस्थिती एवढी गंभीर होते की, रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते.
ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी १ जानेवारी २०२५ रोजी या बंदीचे आदेश जारी केले आहेत. ठाणे पोलीस, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय साधून सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केमिकल टँकरमुळे होणाऱ्या प्रदुषणावर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, केवळ बंदी पुरेशी नसून प्रदुषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
प्रदुषण मुक्त परिसर तयार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नद्यांच्या आरोग्याचे संवर्धन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नद्यांच्या आरोग्यासाठी उठवलेले सदर पाऊल पर्यावरण रक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याचे सकारात्मक परिणाम कसे दिसून येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.