पाणीबिल थकबाकी; २६०६ नळजोडण्या खंडीत

आतापर्यंत ७७.९८ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली

ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरु केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडीत केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच ७३ पंप रुम सील करण्यात आले असून २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. ठामपा पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी ७६ कोटी रुपये थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत.

बील न भरल्यास पाणी पुरवठा खंडीत...  
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करुन ठाणे महापालिकेने पाणी बिल वसुली अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता, खंडीत नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट...
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील, अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच सदर योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.

...तर होणार कारवाई
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करु नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच पाणी बील वसुलीत हयगय करणारे कनिष्ठ अभियंता आणि मीटर रिडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरुन महापालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडीत करण्यात येईल.
-विनोद पवार, उपनगर अभियंता-पाणी पुरवठा विभाग, ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदुषण नियमांचे उल्लंघन; १६४ विकासकांना महापालिकेच्या नोटिसा