बोटींग सुविधेच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्या -आयुक्त सौरभ राव

ठाणे : गेट-वे ऑफ इंडिया येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटींग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  दिल्या आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३५ तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव आणि आंबेघोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट आणि मशीन बोटींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे ३५ पॅडल बोट आणि २ मशीन बोट, उपवन तलाव येथे १६ पॅडल बोट आणि १ मशीन बोट तर आंबेघोसाळे तलाव येथे ४ पॅडल बोट आणि १ मशीन बोट उपलब्ध आहे. सदर कामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटींगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, तसेच बोटींगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांस सेपटी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी, जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटींग करण्यास देवू नये, असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत.  

याशिवाय बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेपटी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉ. पद्मश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी २० डिसेंबर रोजी बोटींग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देवून सर्व गोष्टींचा आढावा घेतला. तसेच बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

ठाणे महापालिका मार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटींगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राखीव भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यास चालढकल