विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव संपन्न
ठाणे : विधानसभा र्सावत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामे केली. त्यांच्या अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळेच निवडणूक पारदर्शकपणे पार पडली असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४मध्ये काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते निवडणुकीत विविध पथकांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भांबरे, आदि उपस्थित होते.
सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकानेच अतिशय सजगपणे कामे केली. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागानेच सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली. आचारसंहिता संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण अतिशय जलदगतीने झाले. ठाणे जिल्ह्यातील काही मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या वेळी अतिशय कमी मतदान झाले होते. यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. स्विप पथकाने केलेल्या जनजागृतीमुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदा जिल्ह्यात ९ टक्के जास्त मतदान झाले आहे. त्याचबरोबर इतर सर्व पथकांनी सर्व अडचणी, प्रश्न, टिका यांना सामोरे जात क्षमतेने कामे केली आहेत. या सर्वांच्या सहकाऱ्यांमुळेच ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामाचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी यांनी कौतुक केले, असे जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जायभाये यांनी देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीचा मागोवा घेऊन सांगितले की, पहिल्या निवडणुकीत देशातील सर्वच पात्र नागरिकांना मतदानाचा पवित्र हक्क मिळावा, यासाठी पाऊले उचलण्यात आली होती. ती परंपरा आजही सुरु असून कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक यंत्रणा काम करत आहे. निवडणूक प्रक्रिया अविरत चालणारी प्रक्रिया असून ठाणे जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी सदर प्रक्रिया पारदर्शकपणे आणि योग्यरित्या पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. माने यांनी निवडणुकीच्या मनुष्यबळ व्यवस्थापनात आलेले अनुभव कथन केले. तसेच निवडणूक काळात काम केलेल्या सर्वांचा गौरव केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.
प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी माने यांनी जिल्ह्यातील निवडणूक कामातील सर्वच घटकांचे आभार मानले. विधानसभा निवडणूक काळात सर्वच यंत्रणांनी अहोरात्र कामे करुन त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पाडली. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कामे अतिशय चांगल्या प्रकारे केली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले असल्याचे सांगितले.
जिल्हा माहिती कार्यालयाचे काम राज्यात उत्कृष्ट...
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अतिशय उत्तम काम झाले असून राज्यात जिल्हा माहिती कार्यालयाचे काम सर्वोकृष्ट असल्याचेही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक काळात माध्यमांना आणि नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा एकत्रित माध्यम कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या नेतृत्वाखाली लिलया पेलले. निवडणुकीच्या संदर्भातील माध्यमांना लागणारी माहिती तातडीने पोचविण्याचे काम या टीमने अतिशय उत्कृष्टपणे केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
एकत्रित माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण-संनियंत्रण समितीचे शिलेदार...
जिल्हा माहिती अधिकारी आणि एमसीएमसी कमिटीचे सदस्य सचिव तथा एकत्रित माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, माहिती अधिकारी तथा सहायक नोडल अधिकारी नंदकुमार वाघमारे, एमसीएमसी कमिटीचे सदस्य प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन, समाजमाध्यम तज्ञ प्रसाद कुलकर्णी, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, ठाणे जिल्हा परिषदच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक अविनाश सकपाळ, सचिन काळुखे, नितीन पाटोळे, कनिष्ठ लिपिक संदीप गोवळकर, भारती वाघ, सहाय्यक छायाचित्रकार धनंजय कासार आणि प्रेम शुक्ला, सचिन गायकवाड, स्वरुप चाया हुले, नमन गणेश खत्री, महेंद्र पटेल यांच्यासह १८ विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी कल्याणी पाटील, परशुराम भोये, श्रीकांत परदेशी, मिलिंद पळसुले, प्रसाद ठाकूर, उज्वला दराणे, उमेश राऊत, छाया प्रकाश डांगळे, रघुनाथ गवारी, मधुरा पटवर्धन, माधवी पोफळे, जितेंद्र कांबळे, तनुजा रणदिवे, सुप्रिया चव्हाण, वि्ील देवराम दळवी, गीता गायकवाड, शंकर खाडे, प्रकाश सानप या सर्वांनी सामुहिकरित्या अतिशय उत्कृष्टपणे केले.