‘स्टेम प्रकल्प'च्या शहाड येथील नवीन पंप हाऊसचे काम दीड वर्षात पूर्ण करावे
स्टेम प्रकल्पात नवीन पंप हाऊस, जलवाहिनी कामांचा शुभारंभ
ठाणे : ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि १२ किलोमीटर अंतराची नवीन जलवाहिनी या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ‘स्टेम'चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत, आदि उपस्थित होते.
मुलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळते. त्या अंतर्गत ठाणे, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी, नवीन पंप हाऊसचे बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणे आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे या कामासाठी २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता दिली. तांत्रिक मान्यता होऊन सुमारे ३ वर्षे प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला.
स्टेम कंपनीकडून सध्या ३०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे ठाणे महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका आणि मिरा-भाईंदर महापालिका तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील काही गावे यांना वितरण करण्यात येते. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे पंप हाऊस आणि जलवाहिनी यांचे बांधकाम १९८५ मध्ये करण्यात आले. कालमानाप्रमाणे सदर पंप हाऊस जुने झाले असून जलवाहिन्याही जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी नवीन आणि जास्त क्षमतेचे पंप हाऊस तसेच जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.
क्षमता वृध्दी आणि वीज बचत...
नवीन पंप हाऊसमुळे पाणी उचलण्याची क्षमता तर वाढेलच. शिवाय नवीन जलवाहिनी अंथरल्यामुळे पाण्याची गळती तसेच घट कमी होईल. तसेच सध्या ९ पंप चालवून पाणी उचलावे लागते. नवीन व्यवस्थेत ६ पंप चालवावे लागतील. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी व्यक्त केला.
स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचे काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम दीड वर्षातच पूर्ण करावे. त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणे शक्य होईल.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.