लाखो अनुयायांचे महामानवाला अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टीकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या ‘महापरिनिर्वाण दिन'निमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. 
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. प्रवीण दरेकर, आ. राजकुमार बडोले, आ. मंगलप्रभात लोढा, आ. दीपक केसरकर, आ. संजय बनसोडे, आ. कालिदास कोळंबकर, आ. अमोल मिटकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती'चे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, आदि उपस्थित होते.
बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिर्द्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, तेे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबध्द आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या ‘संविधान'ला -मुख्यमंत्री फडणवीस
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या ‘संविधान'ला आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवत केले.

तथागत भगवान गौतम बुध्द यांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘संविधान'मध्ये दिसत आहे. बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांचा कार्यकाळ पायाभूत सोयी-सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. बाबासाहेबांच्या कार्यकाळात त्यांनी केलल्या कामातून ‘संविधान'चा अंमल दिसून येतो. सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. यावरुन त्यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानल्या जाते. त्यांनी तेव्हा लिहिलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय ‘भारतीय संविधान'मध्ये आहे. असे जगात सर्वात सुदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल. राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा पहिल्यांदा विचार करणार असून ‘संविधान'च्या अनुरुप कार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री शिंदे
देशाची समृध्दी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या ‘संविधान'मध्ये आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे. त्यांनी दिलेले संविधान कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार सत्ता समाज परिवर्तनाचे हत्यार असल्याने त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सदर विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ना. एकनाथ शिंदे म्हणाले.

डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार -उपमुख्यमंत्री पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि ‘भारतीय संविधान'ला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे.  राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 
मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता आणि समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. चैत्यभूमीवर जमलेला अथांग जनसागर त्याचेच प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रांरभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्राण कार्ड