रामकी कंपनीची संरक्षक भिंत कोसळली; आ. प्रशांत ठाकूर यांची पाहणी
पनवेल : रामकी कंपनी भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असुनही निष्काळजीमुळे भिंत कोसळ्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘पनवेल'चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती नेमावी, अशी सूचना त्यांनी केली. यानुसार पनवेल महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत बैठक होणार आहे.
तळोजा एमआयडीसीसह मुंबई परिसरातील कंपन्यांच्या रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्याचे काम रामकी ग्रुपची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करते. २ वर्षापूर्वी येथील प्रदुषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी कंपनीभोवती सुरु केलेल्या उंच सुरक्षा भिंतीला विरोध केला होता. सिध्दी करवले येथील स्थानिकांनी आंदोलन केले होते. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली भिंत २८ नोव्हेंबर रोजी कोसळली. सिध्दी करवले गावात जाणाऱ्या एकमेव रस्त्याला लागून असलेली भिंत कोसळल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. कंपनीतील रसायनयुक्त लिचडचा भार भिंतीवर टाकल्यामुळे ती कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असुनही निष्काळजीमुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी पोलीस उपायुक्त, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आदिंकडे तक्रार केली आहे. साधारणतः ३० ते ३५ फूट उंचीच्या भिंतीवर कचऱ्याचा मोठा लोड आल्याने ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भात काळजी न घेतल्यास भविष्यात याठिकाणी मोठे अपघात घडू शकतात. संरक्षण भिंत कोसळल्याच्या पार्श्वभुमीवर आ. प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थाळी ३डिसेंबर रोजी भेट दिली. या ठिकाणी जिथे भिंत पडली तेथे भिंतीचा आणखी भाग पडण्याचीही शक्यता असल्याने त्यांनी उपाययोजना संदभात आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा केली.
याप्रसंगी ‘भाजपा'चे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, रवीकांत म्हात्रे, माजी सरपंच गोपीनाथ पाटील, संतोष पाटील, रमेश मढवी, सुरेश पोरजी, माजी सरपंच विष्णू मढवी, संतोष मढवी, वासुदेव मढवी, राजेश महादे यांच्यासह ‘मुंबई वेस्ट मॅनेजमेंट'चे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.