विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कोकण विभागातील निवडणूक तयारीचा आढावा

ठाणे: विधानसभा निवडणूक -२०२४ साठीची मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा निवडणूक विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांना सतर्क राहण्याचे आदेश देत मिश्रा यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण विभागांतर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले.

प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी १९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील.  मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्रा यांनी नमूद केले. मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृध्द मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही. यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना मिश्रा यांनी यावेळी केली.

एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्‌भवली तर त्याचे वृत्त दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरु असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधत वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. त्यामुळे निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही दीपक मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून सुरु असलेली वाहनांची तपासणी देखील काटेकोरपणे करण्याचे निर्देश निवडणूक विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला दिले. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांची मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात असून एखादी समस्या उद्‌भवल्यास तात्काळ ‘निवडणूक आयोग'शी समन्वय साधावा असे नमूद करीत त्यांनी निवडणूका निःपक्षपातीपणे आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

गणेश नाईकांनी नवी मुंबईची लावली वाट