निवडणूक कर्तव्यात कसूर करुन भ्रष्ट मार्गाचा अवलंब

ठाणे: १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.३ आणि ६ मधील उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी लिपिक संकेत चनपूर, संदीप शिरसवाल, मुकादम आण्णासाहेब बोरुडे तसेच या पथकातील पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे यांच्यावर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर तातडीने निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे.

भांडूप (पश्चिम) येथे राहणारे बबन आमले १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास म्हारळ नाका, उल्हासनगर नं.१ या ठिकाणाहून त्यांचे मित्र नितीन शिंदे यांच्यासह इर्टिगा कार मधून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्याकडील फुल मालाची विक्री करुन त्या मालाचे पैसे त्यांना घरपोच देण्यासाठी रोख स्वरुपात रक्कम ७.५० लाख रुपये घेवून जात असताना भरारी पथकाचे प्रमुख संदीप शिरसवाल आणि संकेत चनपूर यांनी आमले यांच्याकडील पैशाबाबत ‘तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, पैसे जप्त करुन ते परत मिळणार नाही' अशी भिती घालून या रक्कमेपैकी ८५ हजार रुपये काढून घेतले.

सदर घटना घडल्यानंतर बबन आमले यांनी पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलीस विभागाने अधिक तपास करुन संपूर्ण घटनेचा अहवाल १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ यांनी याबाबत तपास करुन आणि संबंधितांचे जाबजबाब नोंदवून घेवून २८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांना प्रथम अहवाल सादर केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करुन भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना अहवाल पाठविला. भविष्यात पुन्हा असा प्रकार होवू नये, यासाठी प्रशासकीय कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.

संबंधितांवर प्रशासकीय कारवाई सुरु असताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना ८ नोव्हेंबर रोजी सदरची घटना समजल्यानंतर त्यांच्यामार्फत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांच्याकडून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर ८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय शिस्तभंग विषयक कारवाई करण्याबाबत पाठविलेल्या अहवालाच्या आधारे उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ यांनी संबंधित पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच भरारी पथक क्र.३ आणि ६ मध्ये तातडीने नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.

दरम्यान, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व पथकांनी, अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले निवडणुकीचे काम योग्यरित्या आणि निःपक्षपाती करणेबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कडक निर्देश दिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शिनगारे यांच्या या कठोर कारवाईमुळे मतदारसंघातील सर्वच पथक सतर्क झाले आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

आचारसंहितेची संधी साधून खारघर मध्ये अनधिकृत बांधकाम