नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव देण्याचा मार्ग मोकळा
नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची ‘सर्वपक्षीय कृती समिती'सोबत बैठक संपन्न
पनवेल : लोकनेते ‘दिबां'च्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केली. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नामकरण संदर्भात ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती'बरोबर ७ ऑवटोबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीत ना. नायडू बोलत होते. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘कृती समिती'ने मागणी केल्याप्रमाणे सदरची बैठक नवी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘समिती'शी बोलताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सुरुवातीलाच नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'च्या नावाव्यतिरिक्त इतर कोणाच्याही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला आलेला नसल्याचे स्पष्ट केले.
निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा ‘दिबां'चे नाव फार मोठे आहे. त्यांच्या नावासाठी कोणाचा अडथळाही नाही, आमचे सरकार ‘दिबां'च्या संघर्षाचा सन्मान करते. त्यांच्या नावासाठी आपण केलेल्या संघर्षाच्या आपल्या भावनाही आम्ही जाणतो. ‘दिबां'च्या आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत आम्ही लवकरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला जाहीर करु. राज्य सरकारने पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीस पाठवला आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत ना. किंजरापू नायडू यांनी विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ‘दिबां'चे नाव जाहीर करण्यास आम्हाला आनंद वाटेल, असे यावेळी अधोरेखित केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा कोणताच प्रस्ताव नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होईल. नागरी उड्डाण मंत्रालय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत पाठपुरावा करेल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.
'आचारसंहितापूर्वी नामकरण व्हावं' रामशेठ ठाकूर
तर दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने स्वतःहून बैठक बोलविली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीसाठी प्रयत्न केले. नवी मुंबईमधील ९५ गावातील नागरिकांची सदर भावना आहे. आम्ही ४-५ वर्षापासून संघर्ष करीत आहोत. विधानसभा आणि विधानपरिषदेत ठराव पास झाला होता. नवी मुंबई स्थापन झाल्यापासून दि. बा. पाटील यांनी रक्त सांडले आहे. स्थानिकांना न्याय देण्यासाठी, त्यांना नोकऱ्या-रोजगार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामकरण प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी आमची मागणी आहे, असे मत ‘कृती समिती'चे उपाध्यक्ष माजी खासदा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बैठकीत व्यक्त केले.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, ‘कृती समिती'च्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, भूषण पाटील, जे. डी. तांडेल, संतोष केणे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला होता. बैठकीसाठी अतुल दिबा पाटील, जे. एम. म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, दीपक पाटील, शरद म्हात्रे, सुशांत पाटील तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव विमलूमंग वुलनाम आणि निर्देशक नयोनिका दत्ता आदि यावेळी उपस्थित होते.