वाहतूककोंडीने कल्याणकर हैराण
वाहतूक पोलिसांचे आवाहन
कल्याण : सायंकाळच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नका आणि दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी स्वतःच्या वाहनाऐवजी रिक्षा किंवा ओला टॅक्सीचा वापर करण्याची विनंती ‘कल्याण शहर वाहतूक शाखा'च्या वतीने कल्याणकरांना करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळी आणि सायंकाळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कल्याण पश्चिम मधील मुख्य रस्ते अक्षरशः ठप्प पडलेले पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर ‘कल्याण शहर वाहतूक शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी कल्याणकरांना सदर आवाहन केले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवामुळे दसऱ्यापर्यंत गोविंदवाडी बायपास सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक पत्रीपुल, बैलबाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, लालचौकी मार्गे दुर्गाडी चौक अशी सुरु आहे. मात्र, या मार्गावर प्रचंड मोठ्या संख्येने वाहने आल्यामुळे कल्याण शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. ज्यामुळे कल्याण पश्चिम मधील सदर मुख्य मार्गावर सकाळ पाठोपाठ सायंकाळीही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली.
सदरची वाहतूक कोंडी विचारात घेऊन ‘कल्याण शहर वाहतूक शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी नागरिकांना आवाहन करताना नागरिकांनी सायंकाळच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये, जेणेकरुन ते कोणत्याही वाहतूक कोंडीमध्ये अडकणार नाहीत. दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःचे वाहन आणू नये. त्याऐवजी ऑटो रिक्षा किंवा ओला टॅक्सीचा वापर करावा.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी केलेल्या या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देणार का? आणि आवाहन करण्यापलिकडे वाहतूक पोलिसांकडे इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत का? सण-उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घ्ोऊन प्रशासकीय यंत्रणा आता तरी ठोस उपाययोजना करणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.