फिल्मी स्टाईल थरार
१० आरोपी १२ तासांत गजाआड; अंबरनाथ पोलिसांची कामगिरी
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील एक थरारक आणि चित्तथरारक अपहरण प्रकरण पोलिसांनी केवळ १२ तासांमध्ये उघडकीस आणले आहे. २० वर्षीय तरुणाचे अपहरण करुन ४० कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या गुन्हेगारांचे सर्व मनसुबे उल्हासनगर परिमंडळ-४ च्या पोलिसांनी केलेल्या कुशल तपासासमोर उधळले गेले. अचूक तांत्रिक तपास आणि धाडसी कारवाईमुळे या गुन्ह्यात १० आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या, तर अपहृत तरुणाची देखील सुरक्षित सुटका करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
अंबरनाथ शहरात २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या थरारक अपहरणाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. बांधकाम व्यावसायिक संजय रंभाजी शेळके यांचा २० वर्षीय मुलगा चार्मस ग्लोबल सिटी, अंबरनाथ पूर्व येथे स्विपट गाडीतून प्रवास करत असताना, अपहरणकर्त्यांनी एर्टीगा गाडीतून पाठलाग करुन त्याचे अपहरण केले होते. सदरचे अपहरण अत्यंत धाडसी पध्दतीने फिल्मी स्टाईलने करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी अपहृत मुलाच्या मोबाईलवरुन वडील संजय शेळके यांना फोन करून थेट ४० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच पैसे न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संजय शेळके यांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अपहरणानंतर संजय शेळके यांना वारंवार फोनद्वारे आरोपींकडून खंडणीची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला ४० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी, परिस्थिती ओळखून खंडणीची रक्कम कमी करत शेवटी २ कोटी रुपयांवर आणली. शेळव्ोÀ यांना सदर रक्कम ओला कारमध्ये ठेवून, कार क्रमांक पाठवण्यास सांगितले. परिस्थिती गंभीर असल्याने उल्हासनगर परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलली.
पोलिसांनी ८ विशेष तपास पथके तयार करुन घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील ४५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या तपासादरम्यान पोलिसांना अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या एर्टीगा गाडीचा क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या मोबाईल नंबरचा तपास करुन आरोपींचा माग काढण्यात आला.
अपहरणकर्त्यांनी खंडणी देण्यासाठी ठरवलेल्या ओला कारवर पोलिसांनी गुप्तपणे पाळत ठेवली. आरोपींनी वारंवार ठिकाण बदलत ओला कारला विविध ठिकाणी थांबण्यास सांगितले होते, ज्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. परंतु, पोलिसांनी ओला कारचा गुप्तपणे पाठलाग सुरुच ठेवला. काही वेळानंतर आरोपींना आपल्या आजुबाजुला पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी संजय शेळके यांना फोन करुन मुलगा २० ते २५ मिनिटांत घरी पोहोचेल, असे सांगून फोन बंद केला.
त्याचवेळी पोलीस पथकाने तांत्रिक तपास करत अपहरणकर्त्यांच्या मोबाईल कॉलची लोकेशन ट्रेस केली. लोकेशन पिसे डॅम, वासेरेगाव आणि पडघा, भिवंडी परिसरात मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तेथे शोधमोहीम राबवली. पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचून शोध घेतला असता, पिसे डॅमच्या जवळ अपहृत तरुण आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची सुरक्षित सुटका करुन त्याला वडील संजय शेळके यांच्या ताब्यात दिले.
यादरम्यान पोलिसांनी सीमकार्ड विक्रेता निखील लाबना याला ताब्यात घ्ोतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन विनेश राजू अडवाणी या मुख्य आरोपीसह अन्य १० आरोपींचा तपास लागला. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ एर्टीगा कार, गावठी पिस्तुल, ३ काडतुसे, एअर पिस्तुल, एक धारदार लोखंडी सुरा, लाल नायलॉन दोरी, काळे मास्क आणि ५ मोबाईल फोन असा एकूण १२.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यातील आरोपी देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार यांनी मुंबई महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून विविध जिल्ह्यांतील उमेदवारांची फसवणूक केली होती. त्यांनी प्रत्येकी ८ ते १० लाख रुपये घेतले होते. पोलिसांनी या संपूर्ण घटनेत कुशल आणि धाडसी पध्दतीने कामगिरी करीत १२ तासांच्या आत गुन्ह्याचा तपास लावून अपहरणकर्त्यांना पकडून तरुणाची सुरक्षित सुटका केली.