पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाणे  ः ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता कारवाई सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून ३० मोटर पंप पथकाने जप्त केले आहेत. पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी ७६ कोटी रुपये थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करुन पाणी बिल वसुली अभियान सुरु करण्यास सांगितले होते. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता, खंडीत नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

प्रभाग कारवाई                     वसुली
नौपाडा-कोपरी १५            ४,५४,२७,३२५
उथळसर  ५८                   ३,४७,३२,४९७
माजिवडा मानपाडा ००        ६,२१,७५,४५९
वर्तकनगर ३५                   २,९४,२३,७१०
कळवा ००                       २,४८,५४,२२८
वागळे २४९                      १,६९,७७,६५४
लोकमान्य- सावरकर ३७     ३,००,१५,७४२
मुंब्रा १०५                          ३,८२,७२,४६३
दिवा ११२                          २,८६,९६,९९८
मुख्यालय-सीएफसी ००        २,७६,६०,५५३  
एकूण : ६११                    ३३,८२,३६,६२९

थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट...
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

सदर योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा  लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील, अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच सदर योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांची नवी मुंबई विमानतळ प्रकल्प स्थळी पाहणी