प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांबाबत सत्ताधारी नेत्यांची धूळफेक
शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर ‘बेलापूर'मध्ये परिवर्तन यात्रा - गजानन काळे
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात सत्ताधारी नेते खोटी आश्वासने देत असून सदरचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या नवी मुंबईतील आमदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी ‘मनसे'चे प्रववते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी वाढवलेली घरे नियमित व्हावीत. तसेच नेरुळ, बेलापूर, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली मधील एलआयजी (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) बांधवांनी कुटुंब विस्तारापोटी वाढवलेली घरे सुध्दा नियमित करावी, अशी ‘मनसे'ची भूमिका आहे. सदरी घरे नियमित करण्यासाठी राज ठाकरे यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून या दोन्ही विषयावर ठोस तोडगा काढणार आहे. तसेच गरजेपोटी घरे नियमित कशी करणार यासंदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी ‘मनसे'ची आग्रही भूमिका गजानन काळे यांनी पत्रकार परिषदमध्ये मांडली.
दरम्यान, येत्या २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘मनसे'चे नवी मुंबई मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बेलापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा काढणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या यात्रेत नवी मुंबईतील विविध घटकांना पदाधिकारी भेटणार आहेत. विशेषतः ‘परिवर्तन यात्रा'मध्ये महिला, विद्यार्थी, बुद्धिजीवी, कामगार, व्यापारी, पर्यावरण प्रेमी अशा विविध घटकांना भेटणार आहे.
सीबीएसई, आयसीएसई, खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करा... शाळांची फी नियंत्रणात आणा...
सर्व सीबीएसई, आयसीएसई, खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करुन सर्व शाळांची फी पुढील काही वर्षे वाढू देणार नाही, अशी ठाम भूमिका गजानन काळे यांनी यावेळी मांडली. भरमसाट वाढणारी फी पालकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. ‘मनसे'ने दिलेला उपाय पालकांना मोठा दिलासा देईल. रोजगारासंदर्भात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने नवी मुंबईतील ९२९ कंपन्यांना पत्र पाठवून ८० टक्के रोजगार स्थानिकांना देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कौशल्य, रोजगार विभागाने ८८८ नवीन कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर उद्योग विभागाने ९२९ कंपन्यांना पाठवलेले पत्र तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. ‘परिवर्तन यात्रा'मध्ये मनसे, तरुणांना भेटून त्यांच्याकडून बायोडाटा गोळा करणार आहे, असे गजानन काळे यांनी सांगितले.
दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या बाळाला डॉक्टरांकडून कालावधी संपलेले औषध देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट गजानन काळे यांनी पत्रकार परिषद मध्ये केला. महापालिकेचे डॉवटर औषधे घेण्यासाठी गरीब रुग्णांना खाजगी मेडिकल मध्ये पाठवतात. मग महापालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कशाच्या आधारे बांधणार? असा सवाल काळे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भविष्यात सर्व खाजगी रुग्णालयांना प्रत्येक उपचारासाठी एक दरपत्रक लागू करण्यास मनसे राज्य सरकारला भाग पडणार असल्याचे गजानन काळे यांनी स्पष्ट केले. यामुळे मोठ्या खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबेल.
दरम्यान, ज्या नवी मुंबईकरांना ‘परिवर्तन यात्रा'मध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९७६९७७७८८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे.
‘मनसे'च्या पत्रकार परिषद प्रसंगी महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अमोल आयवळे, आदि उपस्थित होते.